महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?

 महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का?

महाराष्ट्रात सध्या एकूण घडणाऱ्या घटना पाहता महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी विचारांचा होता का यावर चर्चा करण्याची गरज आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात फक्त शाहू फुले आंबेडकर वगैरे विभूतींचा जयघोष करत पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून मिरवले. महाराष्ट्राने देशाला फक्त शाहू फुले आंबेडकर हेच समाजसुधारक दिले आहेत काय? टिळक आगरकर, सावरकर, धोंडो केशव कर्वे, र धो कर्वे, जोशी, जांभेकर, डॉ लाड वगैरे कैक मंडळींना जातीमुळे जाणीवपूर्वक टाळले गेले असेल. मात्र जगन्नाथ शंकर शेट, विठ्ठल रामजी शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे वगैरे मंडळी पण आहेत ना? अशा कितीतरी विद्वान विभूतींनी महाराष्ट्र घडवला आहे. सगळ्यांचीच नावे लिहिली नाहीत पण कित्येक पुढारलेल्या लोकांनी महाराष्ट्र धर्म परिपक्व केला. फक्त जयंत्या मयंत्यांसाठी अशी मंडळी राखून ठेवलेली आहेत का असा प्रश्न पडतो! महाराष्ट्रात वैचारिक मतभेद असणाऱ्या लोकांनी पण महाराष्ट्र घडवला आहे हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे. दर वीस वर्षांनी एक पिढी बदलते असं ढोबळमानाने सांगतात. मात्र वैचारिक अंगाने पिढी कधी आणि कशी बदलत जाते यावर चिकित्सा करणं गरजेचे आहे म्हणून हा लेखनप्रपंच!

महाराष्ट्र राज्य स्थापन झालं १९६० साली. भाषावार प्रांत रचनेनुसार. त्याआधी मराठी भाषिक भूभाग म्हणून म्हैसूर, हैदराबादच्या संस्थानात, मध्य भारत, वऱ्हाड, नागपूर संस्थान आणि मुंबई प्रांतांत मोठ्या प्रमाणात होते. हेच मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झालं आणि एकत्र नांदू लागले. त्यानंतर मराठी भाषिक स्वायत्त राज्य म्हणून जे काही सामाजिक राजकीय आर्थिक दृष्ट्या बदल झाले ते लक्षात घेणे गरजेचे आहेत. सरसकट एकाच पुरोगामी ढाच्यात समस्त महाराष्ट्र पुरोगामी म्हणून राजकीय फायद्यासाठी लादला जातोय. ही पार्श्वभूमी लक्षात आल्यावर एक गोष्ट नक्की समजेल मराठी भाषिक एकजिनसी नाही. खानपान बोलीभाषा इतिहास भूगोल वगैरे विभागानुसार बदलत जाते. कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या भागातील मराठी माणूस स्वतःची वैशिष्ट्ये राखून आणि जोपासत असतो. या सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी आस्था, व्रतवैकल्ये आणि सण, उत्सव वगैरे आघाडीवर आहेत. पुरोगामी विचार हा आघाडीवर आहे का अशा पद्धतीने सगळ्यांना एकजुटीने धरून ठेवण्यासाठी? असायला पाहिजे पण राजकीय परिप्रेक्ष्यातच पुरोगामी विचार खुंटला. तो सार्वजनिक जीवनात मोठ्या प्रमाणात बहरलाच नाही. तो जर अग्रभागी असता तर आज महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात जातपातधर्म वगैरे टोकदार अस्मिता तयार झाल्या नसत्या. विवेकी महाराष्ट्रात प्रबोधनाची परंपरा आहे वगैरे गोष्टी छान वाटतात ऐकायला, वाचायला व लिहायला. प्रत्यक्षात जातीयवादी अस्मिता प्रखर झाल्या आहेत. 

स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडील काही राज्यात ब्राह्मण ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली होती. सनातनी विचार विरुद्ध पुढारलेला नवमतवादी विचार हा एक कालखंड होता. नंतर प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी विचार सुटसुटीत होऊन पुढे आला. या सगळ्यात अस्पृश्यतेविरोधात लढा, दलित, दलितेतर, बहुजन अभिजन वगैरे वैचारिक द्वंद्व चालू होते. अशा परिस्थितीत जर राजकीय विचार मराठी भाषिक अस्मिता घेऊन पुढे आला असता तर आपलं महाराष्ट्र म्हणून देशात भाषिक गुरुत्व बहरलं असतं. तसेच सामाजिक विचारधारा म्हणून जर पुरोगामी विचार पुढे आणला गेला असता तर सामाजिक विषमता वाढली नसती. झालं नेमके उलटे! आपण राजकीय भूमिका पुरोगामी म्हणून स्वीकारली आणि राजकारणी मंडळींना आयतं चरायला कुरण दिलं आणि सामाजिक भूमिका म्हणून मराठी भाषेच्या अस्मितेचा डोस दिला गेला. अशी त्रेधातिरपीट झाल्यानंतर ना पुरोगामी विचार जनसामान्य जनतेत मुरला ना भाषिक अस्मिता सर्वदूर पसरल्या. अशी वैचारिक परिस्थिती असताना पुरोगामी विचार, विवेकी सामाजिक भान आणि जातिविरहीत ऐक्य महाराष्ट्रात मुरायला किती वर्षे, दशके, शतके लागतील? तशी टिकाऊ व्यवस्था उभी जरी राहिली तर तग धरेल काय? अशावेळी विवेकी जागर म्हणून खंडन मंडन चिकित्सा मीमांसा करणं एवढेच उरतं! ही वैचारिक हतबलता आली ती पुरोगामी चळवळ राजकीय टेकूवर उभी राहिली म्हणून. पुरोगामी विचार हा सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी आवश्यक असतो. मात्र महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचार सर्वसमावेशक आणि सामाजिक समरसतेसाठी पुढे सरसावला आणि प्रबळ झाला. 

भारतात महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या जर मध्य पकडला तर दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे प्रामुख्याने राज्यांचे समुह दिसतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाषिक अस्मिता टोकदार आहेत आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषिक अग्रेसर आहेत. मुळातच हिंदी ही अनेक बोलीभाषांमुळे बहरली जोपासली आणि वाढली. राजकीय वरचढ ठरली ती देशाची राजधानी हिंदी पट्ट्यात येत असल्याने. अशा परिस्थितीत दक्षिणेकडील राज्यात भाषिक अस्मितेचे राजकारण हिंदी भाषिक राजकारणात वरचढ ठरते. तसे महाराष्ट्राच्या बाबतीत घडत नाही. आपल्या महाराष्ट्रात कॉस्मोपॉलिटिन कल्चर मुरलेलं आहे. त्यामुळे मराठी भाषिक अस्मिता कधीच टोकदार होऊ शकत नाहीत. उलटपक्षी टोकदार काय झाल्या तर जातीय अस्मिता! कारणं काय तर चुकीच्या व्यवस्थेला पुरोगामी म्हणून रेखाटलं गेलं. उदाहरणार्थ, आजवर महाराष्ट्रात ज्या राजकीयदृष्ट्या व्यक्ती, संस्था आणि पंथ प्रभावशाली होते त्यांनी एक गोड गैरसमज काय पसरवला? दिसला बामन की करतो शोषण, दिसला वंचित की कर शोषित, दिसला दलित की कर पिडीत! असं भ्रमित व्हिज्युअल तयार केलं. पण प्रत्यक्षात काय होतं तर बहुजनांकडेच राजकीय प्राबल्य महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून होतं. १९६० ते १९९० हा कालखंड बघितला तर महाराष्ट्रात संस्थानिकं, जहागीरदार, वतनदार, सरंजामी लोकांचा राजकीय दबदबा दिसतो. १९९० नंतर जागतिकीकरण, अस्ताव्यस्त वाढलेलं शहरीकरण आणि विस्कटलेलं ग्रामीण कृषीक्षेत्र दिसतं. अशा साठ पासष्ठ वर्षांत किमान तीन मराठी भाषिक पिढ्या झाल्या आहेत. त्यांना दिसलेला पुरोगामी विचार एकसंध दिसला असेल काय? ह्या मूळ बाबींकडे लक्ष दिले तर समजेल की महाराष्ट्र पुरोगामी म्हणून अग्रेसर का नाही राहिला राजकारणात. 

तमिळी, मल्याळी, तेलुगू आणि कानडी लोकांसारखा सामाजिक, भाषिक एकात्मता म्हणून मराठी माणूस पुढे आला नाही याचे विवेचन केले पाहिजे. याला सर्वात मोठी खोडा महाराष्ट्रात घातला तो म्हणजे जातीयवाद्यांनी. उदाहरणार्थ जातीय दृष्टी एवढी मुरलेली आहे पुरोगामी महाराष्ट्रात जातीने ब्राह्मण असलेल्या पुरोगामी विचारांच्या लोकांना पण पुरोगामी लोकांनी लक्ष्य केलं आहे बरेचदा. म्हणजे सदासर्वदा ब्राह्मणद्वेष करणारा सोकॉल्ड पुरोगामी कंटाळा आला की पुरोगम्यांमधील कोण कोण ब्राह्मण आहेत हे शोधून उखाळ्यापाखाळ्या काढत बसतात. अशी जर मंडळी असतील तर महाराष्ट्रात पुरोगामी विचार बहरेल की हसं होईल त्याचं? जातीपातीत महाराष्ट्र बरबटलेला आहे हे जगजाहीर आहे मग शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने कंठशोष करून महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणून नेमके काय साधले जाते? सरकार दफ्तरी कागदपत्रे जर तपासली तर समजेल की महाराष्ट्रात ओबीसी कॅटेगरी मध्ये किमान अडीचशे पेक्षा जास्त जाती उल्लेखलेल्या आहे. एससी एसटी एनटी वगैरे कॅटेगरी मध्ये दिडशेच्या आसपास जाती आढळतात. खुल्या वर्गातील वीस पंचवीस जाती आहेत. म्हणजे सव्वाचारशे जातसमुह महाराष्ट्रात आहेत. ही सगळी माहिती आपल्याला सरकारी कागदोपत्री उपलब्ध आहे. यातील उपजाती आणि त्यांच्या निरनिराळ्या शाखा वेगळ्याच. मग एवढा मोठा जातिसमूह पुरोगामी विचाराखाली का आला नाही हा यक्षप्रश्न आहे. 

खरंतर जातपात आणि अस्पृश्यता यावर हिमालया एवढे काम डॉ आंबेडकरांनी केलं आहे. आज मात्र तुम्ही आंबेडकरांना मानत असाल आणि आंबेडकरवादी नसाल तर तुम्हाला परिघाबाहेर केलं जातं. अशाच विस्कळीत परिस्थितीत दलितांच्या चळवळींची गटगतटात शकलं झाली. महाराष्ट्रात कधीकाळी गावगाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बलुतेदार (१२ जातसमुह) आणि अलुतेदार (१८ जातसमुह) व्यवस्था कुशल कारागीर लोकांची होती. तीच अर्थव्यवस्थेची खरीखुरी वाहक होती. मात्र सरंजामी, वतनदार, जहागीरदार आणि संस्थानिकांच्या व्यवस्थेत शोषित व्यवस्था तयार झाली. मूळ पुरोगामी विचार पुढारलेला होता जो ब्राम्हणी व्यवस्थेविरोधातील वैचारिक लढाई होती. राजकीय धुरिणांनी शिताफीने ब्राम्हणद्वेषाचा कौल दिला. याच दरम्यान ब्राम्हणेतर समाजात सरकारी सोयीसुविधा आणि शैक्षणिक सवलती वापरून किमान दोन तीन पिढ्या ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांची दुसरी ब्राह्मणी व्यवस्था त्यांनी तयार केलेली आहे. जिच्याविरोधात खऱ्या अर्थाने सामाजिक लढा उभा राहिला पाहिजे पण राजकीय पुरोगामी लोकांना ब्राह्मणद्वेष प्रिय. प्रस्थापित ब्राह्मणेतर लोकांना मिळालेल्या नव्या अवकाशात त्यांचीच पुढची पिढी सुस्थापित होत राहिली. त्यामुळे खऱ्या अर्थाने वंचित, शोषित आणि पिडीत प्रवाहाबाहेरील समुह तसेच राहिले. त्यामुळे सवर्णाविरोधात जंग जंग पछाडून “नवा प्रस्थापित मवर्ण” वर्ग उभा राहिला. अशा सामाजिक रचनेत अस्सल पुरोगामी विचारांच्या एकछत्राखाली एकजुटीने महाराष्ट्र एकत्र येऊ शकतो का? गेल्या साठ पासष्ट वर्षात नाही आला. आता येणं शक्य नाहीये. वारकरी संप्रदाय हा एकमेव पर्याय होता जिथे सर्व जातीपाती बाजला सारून लोक एकत्र येत असत. पण आजकाल वारकरी संप्रदाय हिंदुत्ववादी विचारधारेकडे झुकला आहे. कारण हिंदुत्व आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक संघटना एकत्र येऊन महाराष्ट्रात सर्व जातसमुहांना एकछत्राखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही अंशी ते सफल झाले आणि राजकीय पटलावर भक्कम झाले. 

एक उदाहरण पाहू. जर दुर्धर आजार पसरला तर आजार पसरवणारे विषाणू बलवान असतात. किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली तर थातुरमातुर आजार पण लवकर बळावतात. त्याप्रमाणे समाज धष्टपुष्ट असेल तर विखारी विकार टिकू शकत नाहीत. जर टिकले तर समाजाचा विवेक हरवलेला आहे समजावे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्याच्या काळात जे काही घडत आहे त्याला जबाबदार हिंदुत्ववादी तर आहेच आहेत आणि तेवढेच पुरोगामी पण आहेत. महाराष्ट्रात वैचारिक बकालपणा पुरोगाम्यांनी सुरू केला तर कळस हिंदुत्ववाद्यांनी चढवला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस हा मूलतः सोशिक आणि श्रद्धाळू आहे. प्रत्येक भारतीय व्यक्तीपूजक असतो तसा मराठी माणूस पण कमी नाही. श्रद्धा, आस्था, अध्यात्म आणि रूढी परंपरा प्रथा या गोष्टी मराठी माणसाला नेहमीच आकर्षित करतात. वहावत जात व्यक्तीपूजा करून डोक्यावर मिरवण्यासाठी बहुतांश मराठी मने नेहमीच तयार असतात. अशा सुपीक जमिनीत अनेक चांगली पिके पण येतात आणि भरमसाठ वाढणारी निरुपयोगी तण, गवत, खुरटी झुडपे येत राहतात. योग्य मशागत, खते आणि औषध फवारणी जर वेळोवेळी केली तर ठिक नाहीतर येणाऱ्या भरघोस पिकाचा बाजार उठल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी फक्त शिक्षण झालेय म्हणून सुशिक्षित आहोत असे होत नाही. विवेक जागरूक असावा लागतो. अशा विवेकी समाजाची महाराष्ट्रात गरज आहे. पुरोगाम्यांनी ती संधी ढिगभर चुका करून घालवली. सध्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव आहे पण ही मंडळी फक्त राजकीय स्वार्थासाठी आसुसलेली आहेत. विवेकी प्रगल्भ समाज तयार करण्याची जबाबदारी ही राजकीय नसून सामाजिक आहे. ही प्रत्येक मराठी माणसाची वैयक्तिक जबाबदारी आहे. सारासार विचार, सद्‌सद्विवेक बुद्धी आणि विवेकाचे समाजभान अखंडित राहो!

©️भूषण वर्धेकर, पुणे 

३० मार्च २०२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top